कस्तुरीगंध

Original price was: ₹ 350.00.Current price is: ₹ 280.00.

प्रा. बी. एन. चौधरी हे खान्देशातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. शैक्षणिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी साहित्याच्या विविध प्रांतात यशस्वी मुसाफिरी केली आहे. ‘माणूस माणूस जोडत जावा’ या सूत्रानुसार त्यांचं जगणं आणि वागणं आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी ते सहजपणे एकरूप होतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून उमटतं. प्रस्तुतच्या ‘कस्तुरीगंध’ संग्रहातील कथा म्हणजे मानवी भावभावनांवर आधारित सुसंस्कृत जगण्याची शिदोरीच आहे. मातृप्रेमात अखंड डुंबलेल्या या अवलियाच्या शब्दांचा गंध साहित्यक्षेत्रात सर्वत्र दरवळतोय आणि एक अनोखे चैतन्य निर्माण करतोय. या संग्रहातील कथा वाचताना जागोजागी त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच साहित्याच्या प्रांतात या कथासंग्रहाच्या रुपाने दमदार भर पडली आहे. बी. एन. चौधरीनानांचे त्यासाठी प्रथम मनःपूर्वक अभिनंदन!
या संग्रहातील कथा माणसाचे चेहरे आणि मुखवटे दाखवून देणार्‍या आहेत. बर्‍याच कथा लेखकाच्या अनुभवावर आधारित बेतलेल्या असल्याने त्याला सत्याची, वास्तवाची किनार आहे. आजूबाजूला घडणार्‍या अनेक घटनांना त्यांना कथारूप दिले आहे. त्यातून माणुसकीचे दर्शन घडते. कृतकृत्याची, कृतज्ञतेची जाणीव होते. डोळ्यात आपसूक पाणी तरळते. चुकीच्या प्रवृत्तीविषयी चीड निर्माण होते आणि सत्प्रवृत्तीविषयीचा अभिमान दाटून येतो. लेखकाच्या शब्दसामर्थ्याचं आणि आपल्यातील जिवंतपणाचं यापेक्षा मोठं फलित ते कोणतं? वाचकाचे रंजन करण्याबरोबरच त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडणार्‍या बी. एन. नानांचे हे मोठे यश आहे. छोटे छोटे संवाद, काळजाचा ठाव घेणारे चित्रदर्शी प्रसंग, सामान्य माणसाविषयी काळजात दाटून आलेला उमाळा, विसंगती अचूकपणे टिपतानाच घडवलेला सद्गुणांचा स्फोट, काही कथांत खान्देशातील अहिराणी शैलीतला गोडवा आणि प्रत्येक कथेतून दिलेला सकारात्मक संदेश यामुळे या कथा त्यांचा ठसा उमटवतात.

Buy now Read more