अवचिता परिमळु

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 175.00.

कोणतीही कविता मनाला तेव्हाच भिडते जेव्हा त्यात अर्थ, भाव आणि रचनात्मक सौंदर्याचा मेळ असतो. त्यातल्या त्यात जर ती उत्स्फूर्त असेल तर रसिकाच्या हृदयाचा ठाव घेते. कुणी ती ठरवून जरी लिहिली तरी तिचा उगम हा अनाहतातूनच व्हायला हवा. कवयित्री डॉ. मेधा गोसावी यांच्या कविता तिन्ही पातळ्यांवर श्रेष्ठ ठरतात. त्या उत्स्फूर्त आहेत. त्यांच्यात रचनात्मक आणि शाब्दिक सौंदर्य आहे. शिवाय त्या भावविभोर आणि अर्थपूर्ण आहेत. व्हाट्सअ‍ॅप कविता वाचून कंटाळलेल्यांनी, मायमराठीच्या काव्य आणि गीत-सौंदर्याचा आस्वाद घेऊ इच्छिणार्‍यांनी, स्वतःचे भाव कुणाला तरी शब्दातून व्यक्त करून दाखवू इच्छिणार्‍यांनी डॉ. मेधा गोसावी यांच्या ‘अवचिता परिमळु’ या काव्यसंग्रहाचा आस्वाद जरूर घ्यावा.
काव्य प्रसाद, प्रेम आणि विरह गीते, स्त्री शक्ती, निसर्गाची आणि दुष्काळाची गाणी, अल्पाक्षरी कविता, पाखंड खंडण अर्थात फटके, श्रीकृष्णाची गाणी आणि गवळणी, अभंग व आर्या, लावण्या, गोंधळ गीते, कथा गीते आणि चंद्र आणि चांदण्या अशा विविध प्रकारांना समर्पित मनाने आणि आपल्या भाषा कौशल्याने सुगंधित करणार्‍या मेधाताईंच्या या कवितासंग्रहात मराठी रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याची ताकद आहे. ‘चपराक प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत असलेल्या काव्यसंग्रहास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

– अवधूत गुप्ते

सुप्रसिद्ध गायक, संगीतकार

500 in stock

पुस्तकाबद्दल

मराठवाड्यातील संत परंपरेचा वारसा लेखणीच्या माध्यमातून समर्थपणे चालविणार्‍या प्रा. डॉ. मेधाताई गोसावी-कुलकर्णी यांचा ‘अवचिता परिमळु’ हा कवितासंग्रह राजधानी दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होतोय. मेध म्हणजे यज्ञ आणि मेधा म्हणजे कुशाग्र बुद्धी! मेधाताईंच्या या संग्रहातून त्यांच्या चिंतनसाधनेचा कवितारुपी धगधगत असलेला ज्ञानयज्ञ दिसून येतो.
‘अवचिता परिमळु’ हे संत ज्ञानेश्वरांचे अद्भुतरम्य काव्य! या काव्याचा गंध आणि भाव प्रस्तुत संग्रहात उतरला आहे आणि त्यामुळेच या संग्रहाचे हे शीर्षकही सार्थ ठरले आहे. साक्षात गोपाळकृष्णच माझ्या भेटीला येतोय आणि त्यामुळे वातावरण सुगंधित झाले आहे, सर्वत्र चैतन्यमयी दरवळ पसरलाय हा माउलींना अभिप्रेत असलेला भाव, ती अनुभूती या काव्यप्रसादातून दिसून येते.
या कवितांत शब्दलालित्य तर आहेच पण मानवी भाव-भावनांचं, जगण्याचं संचित आहे. दुधाचं दही लावावं, दही घुसळून त्याचं ताक करावं, त्यातून अलगदपणे लोणी काढावं आणि त्यापासून झालेलं तुप आनंदानं सेवन करावं त्याप्रमाणे या संग्रहाचे विविध विभाग आपल्याला वेगवेगळी अनुभूती देतील. शृंगार, प्रेम, गवळणी, अभंग-आर्यापासून ते कथांना कवितारूप देण्यापर्यंत सगळं काही या कवितांत आहे.

अवचिता परिमळु, झुळुकला अळुमाळु
मी म्हणें गोपाळु, आला गे माये
तो सावळा सुंदरू, कांसे पीतांबरू
लावण्य मनोहरू, देखियेला

वाचकांची अशीच भावविभोर अवस्था हा संग्रह वाचताना होते. प्रा. मेधाताईंच्या भावी लेखन प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा!

– घनश्याम पाटील